Friday, April 22, 2011

बदल - My first attempt at writing an article in Marathi!


संध्याकाळचे 6 वाजले. श्रीधरला दरवाज्यावरची बेल वाजवल्यानंतर लक्षात आलं की घराची चावी त्याच्या खिशातच आहे... त्याने चावीने दरवाजा उघडला…स्वयपाकघराच्या आत मधून फक्त भांडी आपटण्याचा आवाज ऐकू आला... श्रीधरला आगामी संकटाची कल्पना आली... "आज काही खैर नाही... Madam चा मूड आज सुद्धा ऑफ दिसतोय" असं स्वतःशीच पुटपुटत, आणि, लाटणं कधी हि आणि कुठूनही डोक्यावर बसेल... ह्या भीतीनेच श्रीधर
स्वयपाकघरात शिरला... भांड्यांच आपटणा चालूच होतं... बाहेरून स्वच्छ पण तरीही अगणित पोचं पडलेली ती भांडी बघून श्रीधरच्या ह्रदयात गल्बललं. स्वयपाकघरात पाठमोरी उभी असलेली ती मात्र, भांडी आपटण्यापासून निर्माण झालेला नाद ऐकण्यात, अतिशय गुंग होती... श्रीधरला ती भांडी अचानक स्वतःच्या आयुष्याच्या खूप जवळ वाटली… एके काळी ती भांडी किती छान दिसत… लख्ख… एक समान आकार.. अहो, आधी आधी तर फक्त पाहुणे घरी यायच्या वेळीच ती भांडी कपाटातून बाहेर पडत… त्यात बनवलेला जेवण देखील फार स्वादिष्ट लागायचं म्हणे…पण आज… आजच्या घडीत मात्र “भांडं” आणि “भांडण” ह्यांचंच एक वेगळं नातं जुळलं होतं… 

श्रीधरला त्याचे जुने दिवस आठवले… इंदू आणि त्याची पहिली भेट ही इंदूच्याच घरी कांदे पोहे खाताना झाली. श्रीधर तिच्या करारी डोळ्यांच्या, बघता क्षणीच प्रेमात पडला होता. त्याची विचार चक्रे सुरु झाली. देवक, सप्तपदी, 
अंतरपाट, अक्षता, पंगती, उखाणे, सनईचे सूर - सगळं सगळं काही एका क्षणात त्याच्या मनात डोकावून गेले. तो दिवस किती छान होता… आणि त्या  नंतरचे काही दिवसही… एक अजाण व्यक्ती आपल्या आयुष्यातली सर्वात महत्वाची व्यक्ती होते, जीवन संगिनी होते… लग्नानंतरच्या त्या काही वर्षांमध्ये ही नाती उलगडत जाण्यात किती गंमत असते. प्रेम - प्रेम म्हणजेच सर्वोच्च, प्रेमा मध्ये केलेले त्याग, तिचं एक स्मितहास्य दिसण्यासाठी केलेली धडपड… Platform वर २ तास नुसतं वाट बघत थांबून राहणं.. तेही न चिडता. “तुझी वाट बघत बसण्यात सुद्धा मजा आहे!”… असा विचार करणं… ते सारे अनुभव अविस्मरणीय आहेत… पण सगळ्याच गोड गोष्टी तिन्ही काळ टिकत नाहीत असं म्हणतात… बदल घडतो तो इथे…

श्रीधर आणि इंदूच्या आयुष्यात बरेच बदल आले... काही चांगले, काही वाईट.. श्रीधरच्या मते त्यांच्या आयुष्यात आलेल्या जवळ जवळ सगळ्या बदलांना बेधडक पणे सामोरं जायची शक्ती त्याला इंदू कडूनच मिळाली होती तिचं अखंड मिळणारं पाठबळ त्याला त्यांच्या वाईट परिस्थितीतही उंच भराऱ्या मारण्याचं साहस करू द्यायचं. पण ३ वर्षांपूर्वी श्रीधर आणि इंदूच्या २० वर्षीय अपत्याचे प्रातःकालीन निधन झाल्यामुळे इंदू आता तीच इंदू राहिली नव्हती. इंदूने ह्या बदलापुढे मात्र हात टेकले. ह्या बदलाला सामोरे जाण्याची ताकत आता इंदू मध्ये शिल्लकच नव्हती. एरवी सदैव हसतमुख असलेली इंदू आता मात्र अगदी क्षुल्लक कारणांमुळे चीडचीड करू लागली होती. आयुष्यात आलेला एक अचानक बदल व्यक्तीमत्वात, नात्यात आणि जगण्यात कितीतरी कायमचे बदल करून जातो! ‘प्रेम’, 'आनंद', 'मजा', 'मस्करी' ह्या शब्दांनी घेतलेलं सर्वोच्च स्थान आता ‘वास्तविकता’ ह्या शब्दाने घेतलेलं असतं. प्रेमात पडलेल्या दोन्ही व्यक्तींसाठी संपूर्ण जग हे तीच दोघं असतात. थोड्या वर्षांनी त्यांना कळतं की बाहेरची दुनिया सुद्धा अस्तित्वात आहे. हाच त्यांच्या साठी एक अचानक बदल असतो. हा बदल स्वीकारण्याच्या नादात बऱ्याच गोष्टी गृहीतही धरल्या जातात. आतल्या गाठीच्या व्यक्तींची ‘आतली गाठ’ सहज दिसूही लागते. वास्तविकता स्वीकारणं ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकच कठीण ते आचरणात आणणं असतं. एखादी व्यक्ती ही आधी अशी नव्हती, पण आता अशी का वागते आहे? हा बदल का घडला? ह्या प्रश्नाचं उत्तर मिळणं जवळ जवळ असंभव असतं. पण थोरांनी असं म्हटलंच आहे ‘काळ - हे ह्रदयातील जखमांसाठी रामबाण औषध आहे!’ श्रीधरला हे कळून चुकलं होतं की 'बदल' हा आयुष्यातला एकमेव कायमस्वरूपी घटक आहे. म्हणूनच ह्या वास्तविक्तेशी जमवून घेणं हाच एक सर्वमान्य तोडगा आहे. 

श्रीधरला हे ही अगदी प्रकर्षाने जाणवलं होतं की इंदूची जागा आता त्याला घ्यायची होती... कढई दाणकन ओट्यावर आपटली आणि श्रीधर भानावर आला. त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं आणि पाऊलांमध्ये एक उधाण. इंदूचा प्रोब्लेम जाणून घेण्यासाठी आणि तिच्या चेहऱ्यावरील हसू परत आणण्यासाठी, स्वतः मध्ये हा 'बदल' कसा आणावा हा विचार करीत तो पुढे सरसावला... 

No comments: